Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

ऐसे सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड । तैसी ज्ञानीयांस चाड । अद्वैत ग्रंथाची ।।

।। दास-वाणी ।। 

ऐसे सांगतां असे वाड । 
परी जेथील तेथेंचि गोड । 
तैसी ज्ञानीयांस चाड । 
अद्वैत ग्रंथाची ।। 

योगियांपुढे राहाण । 
परीक्षवंतापुढे पाषाण । 
पंडितापुढे डफगाण । 
शोभा न पवे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०९/१८-१९ 

कोणापुढे कोणते श्रवण लावावे हे निश्चित असते.
मल्हारी मार्तंड आख्यान द्वारकेमधे, द्वारिकामहात्म्य
वाराणसीमधे तर काशी विश्वेश्वर तिरूपतीला
वाचलेला चालत नाही.
अशा सांगण्यासारख्या गोष्टी खूपच आहेत.
तात्पर्य काय जिथे जी गोष्ट चपखल तिथेच ती
योग्य ठरते. आत्मज्ञानी लोकांसाठी अद्वैत ग्रंथच योग्य.
तिथे पुराणकथा काय कामाची ? 

योगी पुरूषांपुढे चेटुकविद्येची प्रात्यक्षिके,
किंवा रत्नपारख्यांसमोर गारगोटीचे दगड
परिक्षेसाठी ठेवले तर काय उपयोग?
ज्ञानी पंडिंतांसमोर कीर्तन प्रवचन निरूपणाऐवजी
रात्रभर डफगाणी आणि भेदिक लावण्या 
सुरू ठेवल्या तर ते शोभेल तरी काय ?

अधिकार तैसा दावियेला मार्ग । 
साहे ओझे त्यांसी तेचि देऊ ।। 
ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार श्रवण दिल्यास 
प्रत्येक भक्ताला ईश्वरप्राप्तीसाठी ते 
सहाय्यकच ठरेल. 

श्रवणनिरूपण समास.
Read Full Article →

श्रवणें सद् बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणे मन हे मागे । भगवंतासी ।।

।। दास-वाणी ।। 

श्रवणें सद् बुद्धि लागे । 
श्रवणें विवेक जागे । 
श्रवणे मन हे मागे । 
भगवंतासी ।। 

श्रवणें कुसंग तुटे । 
श्रवणें.काम वोहटे । 
श्रवणें धोका आटे । 
येकसरा ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०८/१२-१३ 

अध्यात्मिक श्रवणाने कुबुद्धी नष्ट होऊन 
सद् बुद्धी वाढीस लागते.
त्यामुळे अविवेकाचे जाळे झडून 
विवेक म्हणजे योग्य अयोग्याची निवड सुलभ होते.
भक्तिपूर्वक श्रवणाने प्रापंचिक विषयांची ओढ 
संपून जाते. एकाग्र झालेले मन फक्त 
भगवंत दर्शनाचीच तीव्र इच्छा करते.

सुमधूर पवित्र श्रवणामुळे दुष्ट आणि नालायक 
लोकांची संगत आपोआपच तुटून जाते.
कीर्तन निरूपण सातत्याने ऐकल्यावर आपोआपच
भक्ताची निर्वासन वृत्ती बळावते.
कामविकार क्षीण होत जातो.
सामाजिक अध:पतनाचा धोकाही टळतो.

नवविधा भक्तीमधील पहिली श्रवणभक्ती
ही साधकाला पारमार्थिक प्रगतीला 
मार्गदर्शक ठरते.

श्रवणनिरूपण समास.
Read Full Article →

ते आठविंता विसरे । कां तें विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ।।


।। दास-वाणी ।। 

ते आठविंता विसरे । 
कां तें विसरोन आठविजे । 
जाणोनियां नेणिजे । 
परब्रह्म तें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
   दासबोध : ०७/०७/१९

ते म्हणजे परब्रह्म.
परब्रह्माची आठवण करायला गेलो तर 
मायेपोटी त्याचा विसर पडतो.
त्याला पूर्ण विसरून जाऊ म्हटले तर 
ते पुन्हा पुन्हा आठवते.
कारण तेच आपले मूळस्वरूप आहे.
त्याला जाणणे हाच मनुष्याचा हेतु असला पाहिजे.
जो परब्रह्माला खऱ्या अर्थाने जाणतो तो 
त्याला जाणल्याचा दावा कधीच करत नाही.
कारण ..
येथे जाणपण तेचि नेणपण । 
नेणपण तेचि जाणपण । 
आम्ही जालो ऐसे म्हणे । 
तो काहींच नोहे ।। 
खरा ज्ञानी ज्ञानाचा कांगावा कधीच करत नाही.
आपल्याला अजून काहीच समजले नाहीये
असच त्याचे विनम्र वर्तन असते.
याउलट आम्ही झालो. आम्ही पोचलो बरं का ! 
असे जाहीरपणे बडबडणारा शब्दपंडित 
खरे तर शून्य लायकीचा मानावा.

साधनप्रतिष्ठानिरूपण समास.
Read Full Article →